मुंबई : ‘लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिथे शक्ती आहे तिथे काम करण्यासाठी, जागा लढवण्यासाठीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि तिथल्या उमेदवारांच्याबाबतीत चाचपणी करण्यात आली आणि त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल,’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय पक्षाचा आढावा घेतला. या आढावा बैठका संपल्यानंतर आमदार पाटील बोलत होते.
ते म्हणाले, ‘ज्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती आहे अशा सर्व लोकसभा मतदारसंघात पवार साहेबांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा केली. अनेक ठिकाणी उमेदवारांच्याबाबतीत सूचना देण्यात आल्या. त्या मतदारसंघाच्या परिस्थितीबाबत साधकबाधक चर्चाही करण्यात आली; तसेच महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्ते याठिकाणी बोलावण्यात आले होते. यामध्ये जी चर्चा झाली त्यावर अंतिम निर्णय पक्ष भविष्यकाळात घेईल.’
‘हातकणंगले लोकसभा मतदारसंघापासून ते यवतमाळ मतदारसंघापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती आहे तिथल्या कार्यकर्त्यांना बोलावून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पक्षीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे यथायोग्य मतदारसंघात पक्षाने निवडणूक लढवावी की नाही या निर्णय होईल,’ असे पाटील यांनी सांगितले.
‘मुंबईच्या बैठकीत एका जागेऐवजी आणखी एक जागा मागा अशा सूचना कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. पुणे शहरातील कार्यकर्त्यांनाही बोलावण्यात आले होते. शेवटी शक्यशक्यतेचा विचार करून सर्वजण निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपचा पराभव करण्याचे उद्दिष्ट ठेऊन या मतदारसंघातील सगळ्यांशी चर्चा करण्यात आली. कुठल्या जागा मागणार किंवा देणार हा प्रश्न उपस्थित झाला नाही. आम्ही काँग्रेसबरोबर चर्चा करणार त्यात आम्ही जो आढावा घेतला त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाशी चर्चा करणार आहोत,’ असे पाटील यांनी नमूद केले.
‘मनसेच्याबाबतीत कोणतीही चर्चा आम्ही कुणीच केलेली नाही. आपल्या माध्यमातूनच या बातम्या पुढे आल्या आहेत. समविचारी पक्षांमध्ये जे पक्ष बसतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. त्या चर्चा सुरू आहेत आणि मला खात्री आहे की, महाराष्ट्रात सर्व पक्षांना घेऊन एक सक्षम असा पर्याय आम्ही महाराष्ट्रात लोकसभेला देऊ. कुठलाही फॉर्म्युला नाही. निवडून येणे हाच एकमेव त्याला पर्याय आहे. निवडणूक लढत असताना काँग्रेस पक्षाशी मित्रपक्षांशी बोलणे झाले आहे. काँग्रेस पक्षाशी बोलू त्यावेळी या चर्चांचा उहापोह करण्यात येईल. आवश्यक त्या सगळ्या चर्चा काँग्रेस पक्षाबरोबर चालल्या आहेत. काँग्रेस पक्षात आमच्यामध्ये कोणतेही अंतर नाही. आमचे दोन्हींचे विचार योग्य दिशेने चालू आहेत,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, गणेश नाईक, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, माजी मंत्री विजयसिंह मोहितेपाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार राजेश टोपे, आमदार हसन मुश्रीफ, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार जयदत्त क्षीरसागर, ऑल इंडिया अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शब्बीर विद्रोही, ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी नेते उपस्थित होते.